सोलापूरचे सांस्कृतिक वैभव

श्री हिराचंद नेमचंद वाचनालय

Main Building of Library




Pujari Sir

श्रीराम पुजारी यांच्या विषयी

                  दीडशे वर्षापूर्वी सोलापूरात जनरल लायब्ररी स्थापन झाली होती. त्या गिरणगावात या वाचनालयाची फारशी वाढ झाली नव्हती. लहानशा इमारतीतल्या वाचनालयात ग्रंथसंग्रहही मोठा नव्हता. नगरपरिषदेच्या अनुदानातून एक मोफत वृत्तपत्र विभाग तिथं चालवला जात असे. .... गेल्या २० वर्षात वाचनालयाचे नूतनीकरण आणि विस्तार करुन रामभाऊनं त्याचं रुपांतर सांस्कृतीक केंद्रात केलं आहे. रामभाऊनं नव्या वास्तूतील दोन सभागृहांना नावं दिली तीही ज्ञानपीठ पारितोषिक विजेते कवी द.रा.बेंद्रे आणि सोलापूरचे स्वातंत्र्यसैनिक कवी कुंजविहारी यांची. वाचनालय सरकारी मदतीवर किंवा दानशूर व्यक्तींच्या आश्रयावर अवलंबून राहू नये म्हणून ते स्वयंपूर्ण करण्याचा रामभाऊनं ध्यास घेतला आणि आपल्या ग्रंथप्रेमी विद्यार्थ्यांच्या मदतीने त्यानं हिराचंद नेमचंद वाचनालयाचं रुप पालटलं. आज त्या वाचनालयाजवळ एक कोटी रुपयांचा शिलकी निधी आहे.

                  आजही रामभाऊ रेल्वे स्टेशनजवळच्या माणिकचंद चाळीत राहतो. मनाची श्रीमंती त्याच्याजवळ सुरुवातीपासूनच आहे. त्याचं खरं वैभव दिसलं ते पंच्याहत्तरीनिमित्त सोलापूरात जमलेल्या मित्रांच्या मेळाव्यात. व्यासपीठावर वसंत बापट आणि डॉ.लागू यांच्यासह बसले होते समारंभाचे अध्यक्षपद भूषविणारे लोकसभा सदस्य सुशीलकुमार शिंदे, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अजित शहा, रंगभूमी आणि चित्रपट सृष्टी गाजवणारे डॉ.जब्बार पटेल. हे तिघे रामभाऊचे विद्यार्थी. श्रोत्यांमध्ये राजकीय नेते. न्यायाधीश, पत्रकार,लेखक, प्रशासक,कलावंत दिसत होते. आपल्या वाणीनं त्यांनी विद्यार्थीदशेपासूनच अनेक सभा जिंकल्या. त्यांचा विनोद मर्मभेद आहेत. पण या लोकांशीही मैत्रीपूर्ण संबंध त्यांनी ठेवले होते. प्रा. श्री.के.क्षीरसागरांनी एका लेखात म्हटलं. पुजारींच्या मर्मभेदी पण बुध्दिमान विनोदाची अनेकांना भीती वाटत असे. या वक्त्याचा आपल्यावर हल्ला होऊ नये म्हणून संबंधित लोक दक्ष असत. ' अशा अभिप्रायाचं क्षीरसागरांचे हे विधान श्रीराम पुजारी यांच्या वक्तृत्वाबद्दल पुष्कळच सांगून जात.

-य.दि.फडके

                   प्रा.पुजारींच वक्तृत्व रामबाणसारखं भेदक होत. त्यांच्या लोकप्रियतेला एक महत्त्वाचा घटक म्हणजे त्यांची वक्तृत्वशैली. साहित्य, संगीत, नाट्य, आणि काही सामाजिक विषय यावर त्यांनी दिलेली व्याख्यानं श्रोत्यांच्या स्मरणात आजही असतील. खट्याळ आणि खोडकर, विनोदी आणि विडंबक वक्तृत्वाचा एक नमुना म्हणून मी त्यांच्या भाषणाकडं पाहत असे. व्याख्यानासाठी फार पुर्वतयारी करुन ते व्यासपीठावर उभे राहिले आहेत असं क्वचीतच दिसायचं. उत्स्फूर्तता हे त्यांच्या व्याख्यानाचं वैशिष्ट्य, बोलण्याची शैली नाट्यमय. अनेक प्रकारच्या कोट्या आणि चिमटे यांनी भरलेलं त्यांचं भाषण श्रोत्यांना सहज आकृष्ट करुन घ्यायचं.एक विनोदी वक्ता अशीच त्यांची प्रतिमा तयार झाली होती. त्यांचे शब्द मृदू मुलायम असण्यापेक्षा ओरखडे काढणारे, दंश करणारे असत. एखाद्यावर टीकाटिपण्णी करताना त्यांच्या शब्दांना धार चढे ती लक्षणीय असायची. एखाद्या सभेत पुजारी कधी मिळमिळीत , बेचव बोलले आहेत असं मला आठवत नाही. आचार्य अत्रे आणि पु.ल. देशपांडे हे त्यांच्या समोरचे आदर्श होते. पण तरीही पुजारींची बोलण्याची त्यांची अशी एक स्वतंत्र पध्दत होती. आपल्या वाणीनं त्यांनी विद्यार्थीदशेपासूनच अनेक सभा जिंकल्या. त्यांचा विनोद मर्मभेद आहेत. पण या लोकांशीही मैत्रीपूर्ण संबंध त्यांनी ठेवले होते. प्रा. श्री.के.क्षीरसागरांनी एका लेखात म्हटलं. पुजारींच्या मर्मभेदी पण बुध्दिमान विनोदाची अनेकांना भीती वाटत असे. या वक्त्याचा आपल्यावर हल्ला होऊ नये म्हणून संबंधित लोक दक्ष असत. ' अशा अभिप्रायाचं क्षीरसागरांचे हे विधान श्रीराम पुजारी यांच्या वक्तृत्वाबद्दल पुष्कळच सांगून जात.

-डॉ.निर्मलकुमार फडकुले

                  अगदी अलीकडे म्हणजे वयाच्या ७८-७९ व्या वर्षीपण मधूनच पुण्या - मुंबईला भेटायचे. ते इकडे आले की, त्यांचा फोन खणखणायचाच. दर वेळी इथल्या पुस्तक प्रकाशकांना, विक्रेत्यांना भेटून त्यांच्याकडच चांगल काहीतरी वाचायला मिळावं, म्हणून याही वयात चाललेली ती धडपड पाहून मी अवाकच् व्हायचो !

-अच्युत गोडबोले

                  पुजा-यांचा जन्म ८० वर्षापूर्वी अक्कलकोट संस्थानात कर्नाटक सीमेवर असलेल्या एका अगदी लहान खेडयात झाला. प्राथमिक शिक्षण कानडी , मराठीत झालं. वडील भिक्षुकी करीत. त्यांना श्रीराम हा एक मुलगा. बाकी मुली. पुढल्या शिक्षणासाठी तो सोलापूरात आला. तिथेही सोय नीट झाली नाही. म्हणून त्याच्या वडिलांनी, पुण्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील कीर्तीच्या भरवशाने श्रीरामाला तिकडे पाठवले. पुण्यात एखाद-दुस-या मित्राखेरीज कोणीही नव्हते.पण योगायोगाने कवी गिरीशांसारख्या प्रेमळ कवीशी त्याची जवळीक झाली.१९३९ साल आलं. जगात दुसरं महायुध्द सुरु झालं. भारतात स्वातंत्र चळवळ धडाडीची चाल करीत होती. एकून जगाची चर्याच पालटली आणि श्रीरामाचा पुण्यातील चरितार्थ आणि निवारा संपुष्टात आला.

-त्र्यं.वि.सरदेशमुख

                  राम पुजारी त्याच्या नावात देव आणि पुजारी दोन्ही होत,

                  आणि ह्दयात मैत्रीचे अभंग देऊळ होतं ;

                  जिथे जिथे गेले तिथे दुस-यांसाठी जगला ;

                  स्वत:साठी जगायचे अनेकदा विसरुन गेला .

                  संगीतावर वेड्यासारखे प्रेम केलं त्याने,

                  सूर हे त्याचे सात प्राण होते जागे ;

                  सूरजिवाला भिडले की देहभान विसरायचा ;

                  सूर त्याची पूजा होती, सूर त्याचा मोक्ष होता.

                  पंढरीच्या विठोबाचं त्याच अस्सल काळेपण ,

                  पंढरीच्या विठूचीच उरी त्याच्या माया होती ;

                  रखुमाई सुहासिनी सखी त्याच्या आयुष्याची ,

                  विठोबा रखुमाई यांचं देऊळ घर त्याचं.

                  कुठलाही विद्यार्थी रिता कधी गेला नाही ,

                  निर्जीव दगडविटांच्या त्याने जित्या संस्था केल्या ;

                  मदतीचा हात कधी मागे घेतला नाही.

                  खिशातले चणे सुध्दा धनाढ्यांना लाजवणारे.

                  द्वारकेचा श्याम तसा हा सोलापूरचा राम ,

                  त्याची आठवण हेच आमच्या मनातलं देऊळ

    - मंगेश पाडगांवकर